मुंबई,दि.२५.प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संघर्ष हा केवळ मानवाच्या कल्याणासाठी होता, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व भाष्यकार अॅड. प्रज्ञेश सोनावणे यांनी केले.
डोंगरी येथील बृहन्मुंबई महानगरपालिका बी विभागातील मुख्य मलनिस्सारण (बाबुलाल वर्कशॉप) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव मंगळवारी सकाळी १० वाजता उत्साहात पार पडला. यावेळी ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
. सोनावणे पुढे म्हणाले की, समाजातील अनिष्ट प्रथा व रूढींना छेद देत महापुरुषांनी माणसाला माणसाशी जोडण्याचे कार्य केले. मात्र, आज महापुरुषांना जाती-धर्मांत विभागले जात असून त्यामुळे समाजात दुफळी निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कामगार हक्कांच्या संदर्भात त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या लढ्याचा उल्लेख करत, कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिल्याचे सांगितले. तसेच डोंगरी परिसर हा महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्याने पावन झालेला असून, क्रॉफर्ड मार्केट, टाइम्स ऑफ इंडिया इमारत तसेच व्हिक्टोरिया टर्मिनसच्या काही भागांच्या उभारणीत त्यांच्या कंपनीचे योगदान असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी आरक्षण, जनगणना, उपवर्गीकरण, महिला आरक्षण विधेयक, बोनस व अनुकंपा तत्त्व यांसारख्या विषयांवरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. छत्रपती शाहू महाराज यांनी २६ जुलै १९०२ रोजी करवीर संस्थानात ५० टक्के आरक्षण लागू करून बहुजन समाजाला मोठा आधार दिला, तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवला, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला उपमुख्य अभियंता विनायक गवस, सहाय्यक अभियंता श्रीमती प्रांजली नेमाडे, नरेश गुरव, सचिन भगत, दुय्यम अभियंता आकाश परब, कार्यकारी अभियंता सुरेश येमेकर, दुय्यम अभियंता सदानंद गुप्ता, आनंद पाटील, कनिष्ठ अभियंता रोशन ढोणे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष दादू पवार, उपाध्यक्ष मंगेश टोम्पे, सचिव विवेक पवार, खजिनदार लक्ष्मण धनावडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



















