मुंबई, दि.१८ : अजय मगरे
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने अखेर दिव्यांग प्रवाशांसाठी जाहीर केलेली २५ टक्के सवलत लागू करण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. येत्या रविवार, २३ नोव्हेंबरपासून ही सवलत प्रत्यक्षात लागू होणार असल्याची माहिती एमएमआरसीच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. दीड महिना उलटूनही सवलत लागू न झाल्याने वाढलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर हा दिलासा देणारा निर्णय मानला जात आहे.
एमएमआरसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सवलत प्रणाली मेट्रो-3 च्या तिकीट व्यवस्थेत समाविष्ट करण्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, सर्व चाचण्या पूर्ण होताच सवलत प्रणाली प्रभावीपणे सुरू होईल. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दिव्यांग प्रवाशांच्या हक्कासाठी गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने आवाज उठवणारे वरिष्ठ पत्रकार, रुग्णमित्र आणि दिव्यांग हक्कांचे कार्यकर्ते दिपक कैतके यांच्या पाठपुराव्याला या निर्णयाने मोठे यश मिळाले आहे. मेट्रो-3 सुरू झाल्यापासून दिव्यांग सवलत लागू न झाल्याचा मुद्दा त्यांनी ठळकपणे पुढे आणला होता. प्रशासनाशी सातत्याने संवाद साधत त्यांनी दिव्यांग प्रवाशांच्या अडचणी व अपेक्षा प्रभावीपणे मांडल्या.
सवलत लागू झाल्याने मुंबईतील हजारो दिव्यांग प्रवाशांचा दैनंदिन प्रवास खर्च कमी होणार असून मेट्रो सेवेबद्दलचा विश्वासही वाढण्याची शक्यता आहे. स्टेशनवरील अपुऱ्या सुविधा, लिफ्ट अकार्यक्षमता आणि दिव्यांग अनुकूल व्यवस्थांबाबतच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही सवलत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
दिपक कैतके यांचा निर्धार : “पूर्ण सवलत मिळेपर्यंत लढा सुरूच”…
२५ टक्के सवलतीच्या अंमलबजावणीचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी “ही केवळ झांकी आहे… दिव्यांगांना मेट्रो प्रवासात पूर्ण सवलत मिळेपर्यंत आणि संपूर्ण व्यवस्था दिव्यांग सुलभ होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार,” असा ठाम निर्धार दिपक कैतके यांनी व्यक्त केला.
दिव्यांगांच्या मूलभूत प्रवासाधिकारासाठी त्यांचा संघर्ष पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




















