अधिकाऱ्यांकडून सकारात्मक आश्वासन
मुंबई, दि. १८ : मंगेश म्हात्रे
जोगेश्वरी पूर्व परिसरातील अर्धवट एसआरए प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छता, सांडपाणी साचणे, मच्छरांचा प्रादुर्भाव आणि आरोग्यधोका या गंभीर समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जोगेश्वरी शाखेमार्फत मंगळवारी (ता.१८) वांद्रे पूर्व येथील एसआरए कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सुमारे ३०० नागरिकांच्या उपस्थितीने हा मोर्चा उत्स्फूर्तपणे पार पडला.
पास्कल कॉलनी, शंकरवाडी, कोळीवाडा प्लॉट, बांद्रा प्लॉट, अंधेरी प्लॉट, हरीनगर, शिवाजीनगर रामगड आदी वस्त्यांमध्ये ओमकार वेंचर्सच्या अर्धवट प्रकल्पांमुळे चवथ्या मजल्यापर्यंत सांडपाणी साचल्याने परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी डेंग्यू, मलेरियासह विविध रोगांचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये संतापाची भावना उसळली आहे. “पुनर्वसन माणसांचे की मच्छरांचे?”,
पुनर्वसन आरोग्याचे की रोगांचे?” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मोर्चाच्या शिष्टमंडळात जिल्हा सचिव शैलेन्द्र कांबळे, तालुका सचिव अॅड. चंद्रकांत बोजगर, शाखा सचिव अॅंथनी ग्रॅब्रियल, ए. धनपाल, हाजरा शेख आणि हैदर करीम यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने विशेष कार्यकारी अधिकारी नागराज मजगे, कार्यकारी अभियंता हनुमंत माशाळ, सह-अभियंता शैलेन्द्र निकाळजे आणि सब-इंजिनियर प्रवीण पवार यांची भेट घेत निवेदन सादर केले.
अधिकाऱ्यांनी समस्या मान्य करत निवेदनातील मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. तसेच कालपासूनच अर्धवट प्रकल्पांमध्ये साफसफाई सुरू केल्याचेही त्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. मागण्या तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.
मोर्च्यानंतर झालेल्या सभेत शैलेन्द्र कांबळे यांनी चर्चेचा अहवाल नागरिकांसमोर मांडला. तसेच एड.चंद्कांत बोजगर, अँथनी ग्रॅब्रियल, ए.धनपाल, हाजरा शेख, कमल रावत आणि के. नारायणन यांनी मार्गदर्शन केले. घोषणांच्या गजरात हा आक्रोश मोर्चा संपन्न झाला.




















