मुंबई, दि. ७ जुलै ( मंगेश म्हात्रे )
म्हाडा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनियमितता होत असल्याच्या आरोपांवर प्रशासनाने कारवाईचे भूमिका घेतली, तरी प्रत्यक्षात स्थिती फारशी बदललेली दिसत नाही. बदल्यांचे आदेश जारी होत असले तरी काही खास कर्मचारी मात्र वर्षानुवर्षे आपल्या सोयीच्या जागीच कायम राहिले असल्याचे दिसून येते. सूत्राच्या माहितीनुसार, काही कर्मचारी मंत्रालयात जाऊन स्वतःच्या जागा बदलून घेतात, मुदतवाढ मिळवतात, तर इच्छुक ‘फुल अधिकारी’ सुध्दा मोक्याच्या ठिकाणी नियुक्त्या मिळवितात,काहींनी तर थेट बदल्यांचे आदेशच धाब्यावर बसवले आहेत.
याच पार्श्वभूमीवर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी कारवाईचा इशारा देत बदल्यांचे आदेश न पाळणाऱ्या काही अधिकाऱ्यांना शो कॉज नोटीस दिल्याचे सूत्राने सांगितले. तरीही मुंबई मंडळातील काही “खास ” कर्मचारी अजूनही जागच्या जागीच आहेत. मुंबई मंडळाच्या मुख्याधिकाऱ्यांचे एक खास कर्मचारी गेल्या आठ वर्षांपासून त्याच जागी कार्यरत असून, त्यांची बदली मे महिन्यात आरआर बोर्डात करण्यात आली होती. त्यांच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्याची बदली ही करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात दोघांनाही हलवले गेलेले नाही.
मुंबई मंडळातीलच एक अन्य सहमुख्याधिकाऱ्यांचा खास कर्मचारीही आरआर बोर्डात जाण्याच्या आदेशानंतरही जुन्याच जागी काम करत असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यात म्हाडा सचिव नीलिमा धायगुडे यांनी वरिष्ठ लिपिकांच्या बदल्यांचा आदेश काढला होता. त्या आदेशात स्पष्ट केले होते की, नियोजित ठिकाणी रुजू न झाल्यास मूळ वेतन रोखण्यात येईल आणि हजरही करून घेतले जाणार नाही. मात्र प्रत्यक्षात या आदेशांची अंमलबजावणी न होताच सर्व जण आपापल्या जागी कायम असल्याचे चित्र आहे.
याबाबत म्हाडा सचिव नीलिमा धायगुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की , “अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या नियमांनुसार केल्या आहेत. सर्व संबंधित कर्मचारी आपापल्या ठिकाणी रुजू होत आहेत,” असा दावा त्यांनी केला.मात्र प्रत्यक्ष परिस्थिती मात्र या दाव्यांशी विसंगत असल्याचे म्हाडा मधीलच कर्मचारी मान्य करत आहेत. त्यामुळे बदल्यांच्या आदेशांना बगल देणाऱ्या या खास कर्मचाऱ्यांवर प्रशासन खरंच कारवाई करणार का? की पुन्हा हे आदेश कागदावरच राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.




















