कोपरगाव, दि.२४ ( दीपक साटोटे )
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीस प्राधान्य देणाऱ्या शाळांपैकी एक ठरत आहे. या शाळेचे मुख्याध्यापक के डी लव्हाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिकच नव्हे तर बौद्धिक, मानसिक, सामाजिक आणि तांत्रिक विकासावरही विशेष भर दिला जात आहे.

सध्या शाळेत ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी सामान्य कुटुंबांतील असूनही, त्यांना दर्जेदार आणि मोफत शिक्षणाची सुविधा देण्यात येत आहे. पाचवी ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरित केली जातात. प्रवेश प्रक्रिया पारदर्शक असून, कोणताही आर्थिक भार विद्यार्थ्यांवर टाकण्यात येत नाही.
शाळेत ४१ शिक्षक कार्यरत आहेत. प्रत्येक वर्गात ६० विद्यार्थी असून, हजेरीचा टक्का समाधानकारक आहे. शिक्षणासोबतच क्रीडा, संगणक शिक्षण, संस्कार वर्ग, विज्ञान प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) यासारख्या उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.
मुख्याध्यापक लव्हाटे सर म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या बहुआयामी प्रगतीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळावी, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
शाळेतील ही सकारात्मक वाटचाल पालक आणि विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरत आहे.




















