महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याची चर्चा
कोपरगाव, दि.१८.दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरातील येवला रोडवरील महाराष्ट्र शासनाच्या गोदावरी डावा तट कालवा (जलनिस्सारण) उपविभागाच्या इरिगेशन कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या गोडाऊनला आज पहाटे अचानक आग लागून ते पूर्णतः जळून खाक झाले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पहाटेच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास गोडाऊनमधून धूर व ज्वाळा दिसून आल्या. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला कळविले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळविले; मात्र तोपर्यंत गोडाऊनमधील साहित्य भस्मसात झाले होते.
या आगीत नेमके किती नुकसान झाले, कोणते साहित्य किंवा कागदपत्रे जळाली याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र गोडाऊनमध्ये काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे ही आग नेमकी कशामुळे लागली, अपघात होता की घातपात, याबाबत शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
संबंधित विभागाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नसून घटनेचा तपास सुरू असल्याचे समजते. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची चर्चा कोपरगावात सुरू आहे.




















