नागरिकांकडून नगरपरिषद व पशुवैद्यकीय विभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी
कोपरगाव,दि. १२ : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यासह शहरात लिप्पगं रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून अनेक गाय, वासरे आणि इतर जनावरे या रोगाने बाधित झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील विविध रस्त्यांवर या आजाराने त्रस्त जनावरे मुक्तपणे फिरताना दिसत आहेत, परंतु स्थानिक प्रशासन आणि पशुवैद्यकीय विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आजारी जनावरांच्या अंगावर जखमा होऊन रक्त वाहते, माशा घोंगावत असतात आणि ती वेदनेने व्याकुळ होत रस्त्यावर फिरतात, अशी करुण स्थिती शहरातील विविध भागांमध्ये दिसून येत आहे. या मुक्या जीवांच्या वेदना कोणालाच जाणवत नाहीत, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कोपरगाव शहरात नगरपरिषद अंतर्गत पशुवैद्यकीय रुग्णालय तसेच अनेक गौरक्षक संस्था कार्यरत असून, अशा वेळी त्यांनी पुढाकार घेऊन आजारी जनावरांवर उपचार आणि लसीकरण मोहिम राबवावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांनी सांगितले की, “नगरपरिषदेकडे आरोग्य विभाग आहे, पशुवैद्यकीय अधिकारी आहेत; तरीही रस्त्यांवर फिरणाऱ्या जनावरांकडे कुणाचेच लक्ष नाही. या जनावरांना उपचार मिळणे ही मानवी जबाबदारी आहे.”
याबाबत नगरपरिषद व पशुवैद्यकीय विभागाने तातडीने लक्ष घालून आजारी जनावरांच्या उपचारासाठी पथके नियुक्त करावीत, अशी मागणी नागरिक, समाजसेवक आणि गौरक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे.




















