मुंबई, दि.७ : दिलीप गायकवाड
“जोपर्यंत देशात संविधान आहे, तोपर्यंत सर्वसामान्य जनतेला भिती नाही. मात्र संविधान संपवणारे विचार लोकशाही व्यवस्थेलाच थेट धोका निर्माण करतात,” असे स्पष्ट मत लोक स्वराज्य आंदोलनाचे ॲड. नितीन पोळ यांनी महापूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात व्यक्त केले.
ॲड. पोळ म्हणाले, “संविधान संपवणारे विचार म्हणजे असे प्रवाह जे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांना कमकुवत करतात. संसदीय व्यवस्थेऐवजी व्यक्तीवाद किंवा गटशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. नागरिकांच्या हक्कांचे दमन,जाती-धर्माच्या आधारे विषमता वाढवणे, हुकूमशाही प्रवृत्ती, धार्मिक कट्टरता आणि सर्वंकषवाद हे सर्व संविधानाच्या चौकटीला तडा देणारे आहेत.”
यावेळी त्यांनी संविधानाला कमकुवत करणाऱ्या प्रमुख प्रवृत्तींचा विशेष उल्लेख केला.
ॲड. पोळ पुढे म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेद्वारे सर्वसामान्य माणसाला न्याय आणि हक्कांचे संरक्षण दिले. मात्र काही विघातक प्रवृत्ती जाणीवपूर्वक संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा विचारांना रोखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.”
कार्यक्रमाला लोक स्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















