नागरिक पाण्यावाचून त्रस्त; प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर संताप
मुंबई, दि.१७ : मंगेश म्हात्रे
सायन प्रतीक्षा नगर परिसरात गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल झाले आहेत. इमारत क्र. टी-१०, टी-६५, टी-६६ आणि टी-६७ या इमारतींमध्ये अनियमित आणि अपुऱ्या दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे तर गृहिणी, नोकरदार आपला संताप व्यक्त करत आहेत. सणासुदीच्या दिवसांतच पाण्याची समस्या तीव्र झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून आवश्यक उपाययोजना न झाल्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी सकाळी आणि सायंकाळी पाणीपुरवठा होतो खरा. पण पाण्याचा दाब इतका कमी असतो की टाक्या भरल्या जात नाहीत. जुन्या पाइपलाइनमध्ये गळती आणि पाण्याचा अपव्यय यामुळे दाबात घट होत असल्याचे सांगण्यात येते. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
या आहेत तक्रारी –
– कमी दाबाने पाणीपुरवठा
– पिण्याच्या पाण्याचा अपुरा पाणीपुरवठा.
– पाण्याचे व्यवस्थापन नाही.
– पाणी पुरवठ्याची निश्चित वेळ नाही.
-प्रतीक्षा नगर – इमारत क्र टी-१०, टी ६१, ते ६७, बहुमजली इमारत क्र १ ते २० तसेच टी १ ते १९ तीव्र पाणी समस्या
कुठे, कशी परिस्थिती?
मागील तीन वर्षांपासून प्रतीक्षा नगरमधील इमारत क्रमांक-टी-६५, टी-६६ आणि टी-६७ मध्ये अनियमित पाणीपुरवठा आहे. सुरुवातीला पाईपलाईन गळतीमुळे समस्या असल्याचे वाटले; मात्र तपासानंतर या भागात पुरेशा दाबाने पाणीच पुरवठा होत नसल्याचे स्पष्ट झाले. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून ठोस तोडगा निघाला नसल्याने नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.
शिवसेना (शिंदे गट) चे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करताना सांगितले, “गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा नगरच्या काही इमारतीत रहिवाश्यांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत : टी-६५, टी-६६ आणि टी-६७ मधील पाणी समस्या मोठी आहे. या इमारतीतील काही रहिवाशांना घेऊन मुंबई महानगरपालिकेचे मुख्य हायड्रॉलिक अभियंता मालवदे यांची भेट घेतली असून मालवदे यांच्याकडून संबंधित यंत्रणाना समस्या निवारणा संदर्भात आदेश देण्यात आले आहे.
तर भाजपचे मंडळ अध्यक्ष दत्ता केळूसकर यांनी अधिक तीव्र भूमिका घेत, “जोपर्यंत प्रतीक्षा नगरचा पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मी भारतीय जनता पक्षाचा ‘मंडळ अध्यक्ष’ पदाचा वापर करणार नाही. अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. लवकरात लवकर प्रश्न सुटला नाही, तर आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन आणि आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा दिला.
दरम्यान, प्रतीक्षा नगरमधील अनेक इमारतींमध्ये पाणी कमी दाबाने येत असल्यामुळे रहिवाशांना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. नागरिकांच्या या हालअपेष्टांमुळे पाणी प्रश्न आता राजकीय वळण घेत असून, आगामी महापालिका निवडणुकीत हा मुद्दा गाजण्याची चिन्हे दिसत असल्याची चर्चा विभागात सुरू आहे.




















