मुंबई, दि.१२ (अजय मगरे )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेतल्या जाणार आहेत. या नव्या बसेसच्या संचालनासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असल्याने लवकरच एसटीत नोकरभरती केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले, “सन २०२४ पर्यंत एसटीतील भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. मात्र, आता निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि नव्या बसेसच्या गरजेनुसार चालक, वाहक व इतर पदांसाठी भरती आवश्यक ठरणार आहे.” संचालक मंडळाच्या ३०७ व्या बैठकीत या भरतीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली असून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
अभियंत्यांच्या जागाही भरल्या जाणार
सध्या एसटीच्या विविध विभागांमध्ये कुशल अभियंत्यांची कमतरता जाणवत असून विशेषतः पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या प्रकल्पांसाठी बांधकाम विभागात तांत्रिक कौशल्य असलेल्या अभियंत्यांची गरज आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या जागा करार पद्धतीने किंवा सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
प्रत्येक खात्याने आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेरआढावा घेऊन आवश्यकतेनुसार भरतीसाठी एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
“एसटीच्या सक्षमीकरणासाठी केवळ बस नव्हे, तर कुशल व तांत्रिक मनुष्यबळाचीही तितकीच गरज आहे. यासाठी आगामी काळात भरती प्रक्रिया वेगाने राबवली जाईल,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.




















