ठाणे, दि.१४ (प्रतिनिधी)
ठाणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक टप्पा गाठत आज घोडबंदरवरील अत्यंत महत्त्वाच्या भाईंदरपाडा उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

या उड्डाणपुलाच्या बांधकामाची खासियत म्हणजे मेट्रो लाईन ४ व ४ए च्या व्हायाडक्टवर त्याची उभारणी, ज्यामुळे जागेचा उत्कृष्ट वापर साधत रस्ता आणि मेट्रो यांच्यातील समन्वय साधला गेला आहे. भविष्यात मेट्रो सुरू झाल्यावर या भागातील रहिवाशांना सहज आणि जलद सेवा उपलब्ध होणार आहे.
हा प्रकल्प ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, जेएनपीटीसह बोरिवली, वसई-विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या मार्गासाठी वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रकल्प वैशिष्ट्ये: एकूण रॅम्प लांबी: ६०१ मीटर ,२+२ मार्गिका: प्रत्येकी ७.५ मीटर,भुयारी मार्ग: लांबी २०.४ मी, रुंदी २९.७मी, वाहन घनता: अंदाजे ७३,३३३ पीसीयू फायदे:गुजरात ते जेएनपीटी दरम्यानच्या जड वाहन वाहतुकीस चालना,गायमुख-वाघबिल दरम्यानची वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी,प्रवासाचा वेळ वाचून सरासरी वेगात वाढ, स्थानिकांसाठी स्वतंत्र भुयारी मार्गामुळे सुलभ वाहतूक
ठाणेकरांसाठी ही केवळ वाहतूक सुधारणा नसून जीवनशैलीतील सकारात्मक बदल असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. तर, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पामुळे आर्थिक आणि औद्योगिक हालचालींना चालना मिळणार असल्याचे सांगितले.
हा प्रकल्प ठाणेच्या वाढत्या वाहतूक गरजांना उत्तर देणारा ठरून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणेल, असे चित्र आजच्या लोकार्पण सोहळ्यातून स्पष्ट झाले.




















