मुंबई, दि.१९ ( प्रतिनिधी )
सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणाऱ्या आणि सुरक्षित घरांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्य सरकारने व्यापक गृहनिर्माण धोरण तयार केले असून, त्याचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण धोरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव विकास खारगे,
गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “राज्यातील वाढते शहरीकरण आणि वाढती घरांची मागणी लक्षात घेता, हे धोरण सर्वसमावेशक असावे. ज्येष्ठ नागरिक, नोकरदार महिला, विद्यार्थी, औद्योगिक कामगार अशा सर्व समाजघटकांचा यात समावेश असावा.”
या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी धोरणाचे सविस्तर सादरीकरण केले. धोरणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.




















