कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी जलदगतीने सर्वेक्षण करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. २० ( प्रतिनिधी )
कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्वेक्षणाचे काम निविदेनुसार निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देण्याचे सांगितले.
या प्रकल्पात जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रतिसाद क्षमता विकास प्रकल्प (एमआरडीपी) अंतर्गत मदत व पुनर्वसन विभागाकडून जलसंपदा विभागातील कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे कामे हस्तांतरित करण्यात आली आहेत. बैठकीत पवना धरण परिसरातील पर्यटन विकास आराखड्याचाही आढावा घेण्यात आला.
बैठकीस ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके, तसेच दोन्ही खोऱ्यांच्या विकास महामंडळांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.
मंत्री विखे-पाटील म्हणाले की, “सर्वेक्षणाचे काम गतीने पूर्ण झाल्यास पुढील निविदा प्रक्रिया सुलभ होईल. एमआरडीपी अंतर्गत कामांचे सर्वेक्षण तीन महिन्यांत पूर्ण करावे. गरज भासल्यास अतिरिक्त एजन्सी नेमून कामे पूर्ण करा व सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सादर करा.”
यावेळी राधानगरी धरणाच्या गेटचे काम तसेच सांगली-कोल्हापूर बंधाऱ्यावर बॅरेज बांधण्याच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. ही कामे लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही मंत्री महोदयांनी दिले.
पवना धरणाच्या पर्यटन विकासासाठी सादरीकरण
पवना धरण परिसरात पर्यटन सुविधा विकसित करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सादरीकरण केले. त्यावर मंत्री विखे-पाटील यांनी पर्यावरणस्नेही व प्रदूषणविरहित पर्यटन आराखडा तयार करण्याचे तसेच धरण परीसरातील अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले.
या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील जलसंपत्तीचे अधिक प्रभावी नियोजन आणि वापर शक्य होईल, तसेच सिंचन व पर्यटन क्षेत्रालाही गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




















