मुंबई, दि.२ ( प्रतिनिधी )
अंमलीपदार्थांच्या तस्करीवर अधिक कठोर कारवाई करण्यासाठी राज्य सरकार कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. ‘एनडीपीएस’ (NDPS) कायद्याअंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीनावर सुटल्यावर पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्या विरोधात आता ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके व एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे विधिमंडळ अधिवेशनातच संबंधित कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र एनडीपीएस युनिट स्थापन करण्यात आले असून त्यात अधिकारी व अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, जिल्हा स्तरावर समन्वय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन ते अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.”
केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे राज्यस्तरीय व आंतरराज्यीय समन्वय अधिक प्रभावी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सर्व राज्यांमध्ये ‘इंटेलिजन्स’ शेअरिंग सुरु असून त्यामुळे तस्करांविरुद्ध समन्वयाने कारवाई शक्य झाली आहे.
व्यसनमुक्तीसाठी अधिक सक्षम केंद्रांची गरज लक्षात घेता, सध्या सुरू असलेल्या केंद्रांची गुणवत्ता वाढवून नवीन दर्जेदार व्यसनमुक्ती केंद्रांची उभारणी करण्याचे धोरण तयार करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
गांजाच्या शेतीसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “गांजाची शेती महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातही कायदेशीर नाही. गांजा, गुटखा किंवा तत्सम अंमलीपदार्थांची तस्करी होत असल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल.”




















