ठाणे,दि. २९ : अजय मगरे
मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने आज रामचंद्र नगर, गणेश मित्र मंडळ, शिवसेना शाखेजवळ, ठाणे (प.) येथे नागरिकांसाठी विशेष माहिती उपक्रम राबविण्यात आला. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या उपक्रमात नागरिकांना विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर उपक्रमामध्ये पात्रता निकष, वारस नोंदणी प्रक्रिया, अभय योजना, तसेच विविध प्रलंबित प्रश्नांचे निराकरण यासंदर्भात अधिकाऱ्यांनी माहिती दिली. दिवसभर मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या प्रसंगी प्राधिकरणाच्या सक्षम प्राधिकारी-४ श्रीमती मीनल पालांडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारींचे ऐकून तत्काळ तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमानंतर नागरिकांनी प्राधिकरणाने हाती घेतलेल्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेबाबत समाधान व्यक्त केले. “शासन लोकांच्या दारी येऊन थेट प्रश्न सोडवते, ही कौतुकास्पद बाब आहे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त करत प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माळवी, सक्षम प्राधिकारी-४ श्रीमती पालांडे व सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानले




















