मुंबई, दि. ७ : अजय मगरे
ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा आणि ई-बाईक टॅक्सी सेवांसाठी समुच्चयक धोरण नियमावली येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असून, या नियमावलीत प्रवासी आणि चालकांच्या अनेक तक्रारींना उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भविष्यात या सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना प्रवासी आणि चालकांना केंद्रस्थानी ठेवूनच कामकाज करावे, नफा कमविण्याच्या नादात त्यांची आर्थिक लुबाडणूक करू नये, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
मंत्रालयात झालेल्या इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सहसचिव (परिवहन) किरण होळकर, तसेच आयएफएटीचे अध्यक्ष प्रशांत सावर्डेकर व त्यांच्या संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सरनाईक म्हणाले, “ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या काही संस्थांविरोधात प्रवासी आणि चालकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या संस्थांनी नफेखोरीच्या नादात चालक व प्रवाशांच्या हितांकडे दुर्लक्ष करून व्यवसाय केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे नवीन धोरणात या दोघांच्या सुरक्षेला, हक्कांना आणि आर्थिक हिताला प्राधान्य देण्यात आले आहे.”
राज्य सरकार या माध्यमातून प्रवासी व चालक या दोघांनाही न्याय मिळावा आणि वाहतूक क्षेत्र अधिक पारदर्शक व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही सरनाईक यांनी नमूद केले.




















