मुंबई, दि. २१ : अजय मगरे
नायगाव पोलीस मुख्यालय येथे आज आयोजित पोलीस स्मृतिदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी पोलीस स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून वीर शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
या प्रसंगी मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे वाणिज्यदूत, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संदेशातून देशभरातील गेल्या वर्षभरात हौतात्म्य प्राप्त झालेल्या ३४ पोलीस अधिकारी आणि १५७ पोलीस अंमलदार, असे एकूण १९१ शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी म्हटले की, “हे पोलीस हुतात्मे देशाच्या सुरक्षेसाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे खरे राष्ट्रवीर आहेत.”
कार्यक्रमादरम्यान शहीद पोलिसांची नावे वाचून दाखविण्यात आली. त्यानंतर पोलीस बँड पथकाने सलामी शस्त्र धून सादर केली. गणवेशधारी जवानांनी ताठ उभे राहून सलामी दिली तर श्रद्धांजली म्हणून तीन बंदुकींच्या फैरी झाडण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित देश-विदेशातील पाहुण्यांची, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आणि शहीदांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.




















