स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकजुटीने लढवणार — नितीन शिंदे व ॲड. संदीप वर्पे यांची माहिती
कोपरगाव, दि. ३१ : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते व तालुकाध्यक्ष नितीनदादा शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपराव वर्पे यांनी काँग्रेस नेते मा. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निवडणूक रणनितीबाबत चर्चा केली.
निवडणुकीत उबठा पक्ष स्वतंत्र पद्धतीने उतरण्याच्या हालचाली करत असल्याने, दोन्ही काँग्रेस गटांनी एकत्र राहून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिंदे व वर्पे यांनी दिली. “उबठा पक्ष बेडूकूळ्या काढत असून, कोणताही ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे आम्ही ठामपणे एकत्र येऊन सर्व जागांवर उमेदवार देणार आहोत,” असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व स्तरांवर म्हणजे नगरपरिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. उमेदवारांची चाचपणी जवळपास पूर्ण झाली असून, आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार थोरात साहेब व पवार साहेब ठरवतील. पंचायत समिती व जिल्हा परिषदेबाबतचा निर्णय वरिष्ठांकडून येणाऱ्या आदेशानुसार घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उबठा पक्षातील नेते मंडळी कोणतीही सकारात्मक चर्चा करण्यास तयार नसल्याने दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्र राहण्याचा निर्णय ठाम झाला आहे. त्यामुळे या वेळी कोपरगाव तालुक्यातील निवडणूक रंगतदार होणार असून राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय पातळीवर सध्या चर्चेला उधाण आले असून, कोपरगाव तालुक्यातील जनता “उबठा पक्ष स्वतंत्र लढणार की दोन्ही काँग्रेससोबत जाऊन लढणार?” याकडे उत्सुकतेने पाहत आहे.दरम्यान, भाजप युतीविषयी लोकांमध्ये रोष कायम असल्याचे स्थानिक पातळीवर दिसून येते. तसेच काळे व कोल्हे गट ही निवडणूक एकत्र लढवणार की स्वतंत्र? याकडेही कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे.
सध्या कोपरगाव तालुक्यात काँग्रेस पक्षाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवत असून, यावेळची निवडणूक चुरशीची होण्याचे संकेत स्पष्ट दिसत आहेत.




















