खाडी किनारी ५० एकरात भारतातील सर्वांत उंच व्हिविंग टॉवर; बीओटी तत्त्वावर विकास
ठाणे, दि.१५ : अजय मगरे
ठाणेकरांच्या मनोरंजन, पर्यटन आणि क्रीडा सुविधांमध्ये भरीव भर घालणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प लवकरच साकार होणार आहेत. ठाणे खाडी किनारी तब्बल ५० एकर क्षेत्रात भारतातील सर्वांत उंच व्हिविंग टॉवर उभारण्यात येणार असून त्याची उंची २६० मीटर असेल. फ्रान्समधील आयफेल टॉवर ३०० मीटर उंच असल्याने हा टॉवर देशातील मानबिंदू ठरणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारल्या जाणार आहेत. कासारवडवली येथे आधुनिक कन्व्हेन्शन सेंटर, तर कोलशेत परिसरात २५ एकरमध्ये टाऊन पार्क साकारले जाईल. आगरी-कोळी संस्कृतीचे दर्शन घडवणारे संग्रहालय, अत्याधुनिक मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, ॲम्युझमेंट पार्क आणि ॲडव्हेंचर पार्कही विकसित करण्यात येणार आहेत.
याशिवाय ठाण्यात १२.५ एकरमध्ये पक्षी संग्रहालय, २५ एकरमध्ये भव्य म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर आणि ५० एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. या सुविधांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना उच्च दर्जाच्या क्रीडा-सुविधा उपलब्ध होतील, तसेच शहराचे पर्यटनमूल्य लक्षणीय वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देत ठाणे महापालिकेकडून मीरा-भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडणारा १८.४ किलोमीटर लांबीचा ‘आनंदवन’ हरित पट्टा विकसित करण्यात येणार आहे. या हरित पट्ट्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडून ठाणेकरांचे जीवनमान उंचावेल.
या बहुतेक प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया सुरू झाली असून सर्व प्रकल्प बीओटी (बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) तत्त्वावर विकसित केले जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे ठाण्याच्या विकासाचा वेग अधिक वाढेल, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.




















