मेट्रो मार्गांवरील १.१४ लाख मीटर बॅरिकेड्स हटविले
मुंबई : अजय मगरे
पावसाळ्यापूर्वी मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी एमएमआरडीएने मोठी मोहीम हाती घेतली आहे. विविध मेट्रो प्रकल्पांअंतर्गत उभारण्यात आलेले १.१४ लाख मीटरहून अधिक बॅरिकेड्स हटवून अनेक मार्गांवरील रस्ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

मेट्रो प्रकल्पांतील व्हायाडक्ट आणि अन्य संरचनात्मक कामे अंतिम टप्प्यात पोहोचल्याने पूर्ण झालेल्या मार्गांखालील बॅरिकेड्स टप्प्याटप्प्याने हटविण्यात येत आहेत. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आढावा बैठकीत या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
मेट्रो मार्ग २बीवर १८,२७७ मीटर, मार्ग ४ व ४एवर ३१,७०६ मीटर, मार्ग ५वर ११,१३४ मीटर, मार्ग ६वर २८,९५२ मीटर आणि मार्ग ९वर १७,२७५ मीटर बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत. मार्ग १२वरील कामही वेगाने सुरू असून मार्ग ७एवर टप्प्याटप्प्याने बॅरिकेड्स काढले जात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “मेट्रो प्रकल्पांसोबत नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुलभ राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. बॅरिकेड्स हटविल्याने रस्त्यांची उपलब्ध रुंदी वाढून वाहतूक कोंडी कमी होईल,” असे सांगितले.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “मान्सूनपूर्वी ज्या ठिकाणी प्रमुख कामे पूर्ण झाली आहेत, त्या ठिकाणी तातडीने रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,” असे स्पष्ट केले.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी सांगितले की, मान्सून काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी डिवॉटरिंग पंप, आपत्कालीन यंत्रसामग्री, सुरक्षा कर्मचारी आणि २४x७ प्रतिसाद पथके सज्ज ठेवण्याचे आदेश सर्व कंत्राटदारांना देण्यात आले आहेत.


















