काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांचा थेट आरोप,
कोपरगाव,दि.१८.दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरातील काँग्रेस भवनाच्या दुरवस्थेचा मुद्दा अखेर उघडपणे समोर आला असून, या प्रकरणात गंभीर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी व्हिडिओ मुलाखतीतून काँग्रेस प्रेमी व हितचिंतकांसमोर धक्कादायक खुलासा करत काँग्रेस भवन, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, श्री साईबाबा मंदिर परिसरातील शासकीय जमीन हडप करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप केला आहे.
“काँग्रेस भवनाची अशी दुरवस्था का झाली, याचे खरे कारण जनतेसमोर यावे म्हणूनच ही मुलाखत दिली,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. अनेक नागरिक व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते भवनाबाबत विचारणा करत होते. त्यांना वस्तुस्थिती समजावी म्हणून पुराव्यासह हा खुलासा केल्याचा दावा त्यांनी केला.
शिंदे यांनी थेट आरोप करत म्हटले की, काहीजण आर्थिक गैरव्यवहारांवर पांघरूण घालत काँग्रेस भवन आणि त्याची जागा हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत. “कागदपत्रांत फेरफार करून जागेवर डोळा ठेवला जात आहे. हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी मुलाखतीत दिला.
दरम्यान, विद्यमान आमदार अशुतोष काळे व त्याच्या पत्नी यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “ते काँग्रेसचे कधीच नव्हते. त्यांनी कोपरगांव विधानसभेत प्रथम महिला आमदार सेन्हलताताई कोल्हे ,निवडून आल्या त्यावेळीस मा आमदार हे काँग्रेस तिकिटावर लढले नव्हते ,आणि पराभव पत्कारावा लागला यांनतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या तिकिटावर निवडणूक लढवली,” असे ते म्हणाले.
तसेच माजी आमदार आशोकदादा काळे हे शिवसेना पक्षाकडून निवडून आले होते, अशी आठवण करून देत “कर्मवीर शंकरराव काळे यांनी काँग्रेसकडून निवडून येऊनही कधी या भवनावर हक्क सांगितला नाही. मात्र आता कागदपत्रांत बदल करून ताबा घेण्याचा प्रयत्न नीतिमत्तेला धरून नाही,” असा घणाघात शिंदे यांनी केला.
“काँग्रेस भवन व जागेचा ताबा स्वखुशीने सोडावा. अन्यथा काँग्रेस प्रेमी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील,” असा इशारा देतानाच शिंदे यांनी स्पष्ट केले की, सध्या पक्ष कायदेशीर मार्गाने लढा देत आहे. “कोपरगाव तालुक्यात काँग्रेसची पकड आजही मजबूत आहे. कार्यकर्त्यांचा संयम हा आमच्यावरच्या विश्वासामुळे आहे,” असे ते म्हणाले.
आता या गंभीर आरोपांवर आमदार काळे काय भूमिका घेणार, याकडे कोपरगावकरांचे लक्ष लागून आहे. काँग्रेस भवन प्रकरणामुळे तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.




















