अहिल्यानगर,दि.२३.( दिलीप गायकवाड )
भेदभाव आणि द्वेषाचे वातावरण वाढत असताना सौंदाळा (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) या गावाने ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर करून एकता, समता आणि बंधुत्वाचा आदर्श घालून दिला आहे. हा विचार राज्यभर पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
सौंदाळा गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी समाजात भीती आणि जातीय भिंती उभ्या करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची खंत व्यक्त केली. अशा परिस्थितीत गावाने ‘डरो मत’चा संदेश देत सकारात्मक पाऊल टाकले, असे ते म्हणाले.
यावेळी सरपंच शरद आरगडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीदिनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांना साजेसा असल्याचेही सपकाळ यांनी नमूद केले.




















