मुंबई,दि.२४.( अजय मगरे )
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. सखोल आणि निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्यक्त केली.
या प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी सात गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) तर एक गुन्हा नाशिक शहर गुन्हे शाखेकडे आहे. आरोपीच्या मोबाईलमधील डिलीट डेटा पुनर्प्राप्त करून तपास पुढे नेण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
तपासादरम्यान काही व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये महिलांना भोंदूगिरी, जादूटोणा व धार्मिक विधींच्या नावाखाली लज्जास्पद कृत्य करण्यास भाग पाडल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत सहा पीडित महिलांची ओळख पटली असून त्यांच्या तक्रारींवरून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, आरोपी देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले असून त्याच्या घर, कार्यालय आणि फार्महाऊसवर छापे टाकून रोख रक्कम, लॅपटॉप व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात आरोपीकडे सुमारे ४० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचेही समोर आले आहे.



















