ठाणे, दि.२५.( अजय मगरे )
गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला असून, या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
कोल्हापूरमध्ये घडलेल्या धमकीप्रकरणाचे पडसाद आता ठाण्यात उमटू लागले आहेत. शेतकरी कामगार पक्ष (शे.का.प) आक्रमक भूमिकेत येत संबंधित घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आहे. पक्षाच्या वतीने ठाणे जिल्हाध्यक्ष प्रसाद साळवी आणि ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी आमदार गायकवाड यांच्यावर कडक शब्दांत टीका केली.
“लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारची भाषा वापरणे अत्यंत निंदनीय आहे. आमदारांनी आधी बालभारतीची पुस्तके वाचून सभ्यतेचा धडा घ्यावा,” अशा शब्दांत साळवी यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून, संबंधित आमदारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. ठाण्यातील कार्यकर्त्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.



















