कोपरगाव : दिलीप गायकवाड
‘गायछाप’ आणि ‘ओम पंढरपुरी’ नावाने विकल्या जाणाऱ्या तंबाखू उत्पादनांवर गोमातेचे चित्र, ‘ओम’ चिन्ह आणि पंढरपूरच्या नावाचा वापर होत असल्याचा आरोप करत ‘माझं गाव माझा अभिमान कोपरगावकर’ संघटनेने १६ जुलैपासून कोपरगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, या उत्पादनांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून संबंधित कंपन्यांविरोधात तातडीने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय दंडाधिकारी, शिर्डी यांनी २१ एप्रिल २०२६ रोजी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांनी २९ मे २०२६ रोजी स्थानिक पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाला आवश्यक कारवाईचे निर्देश दिल्याचा दावा संघटनेने केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता ट्रेडमार्क कायदा आणि कोटपा कायद्यानुसार संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करून बाजारातील आक्षेपार्ह पाकिटे जप्त करावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. प्रशासनाने सात दिवसांत कारवाई न केल्यास १६ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा दावा संघटनेने निवेदनात केला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व विनय भगत, मयूर आव्हाड, अमित आढाव, विजय जाधव तसेच ‘माझं गाव माझा अभिमान कोपरगावकर’ संघटनेचे पदाधिकारी करणार असल्याचे सांगण्यात आले.सदर या आंदोलनास बहुजन शक्ती सामाजिक संस्था, कोपरगांव, महाराष्ट्र प्रदेश यांनी पाठीबा दर्शवला आहे. तरी तमाम गोमाता प्रेमी आणि ओम, व पंढरपूर तीर्थक्षेत्र श्रध्दाळू भाविक व नागरीकानी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे माझा गांव माझा अभिमान अंर्तगत जाहीर अहवान केले आहे.




















