वादळी वाऱ्यानंतर अनेक ठिकाणी वीज पोल झुकले; जिवितहानीची भीती
दावरवाडी, दि.२८ (प्रतिनिधी )
पैठण तालुक्यातील दावरवाडी गटातील खेर्डा तांडा येथे महावितरणच्या वीजपुरवठा करणाऱ्या अनेक पोलांची अवस्था धोकादायक बनली आहे. मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक पोल झुकले असून, महावितरणने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.
खेर्डा तांड्यास बालानगर महावितरण कार्यालयातून वीजपुरवठा केला जातो. गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तसेच मोती तांड्याकडे जाणाऱ्या मुख्य लाईनवरील अनेक पोल झुकल्याचे दिसून येत आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पोलही मोठ्या प्रमाणात कलंडले आहेत.
गंगुबाई सूर्यभान पांगरे (गट नं. ७१/१), अंकुश शामा राठोड, कृष्णा शंकर राठोड, शंकर शामा राठोड (गट नं. ७२), रामधन तुकाराम राठोड व चंद्रकला कल्याण राठोड (गट नं. ७३) यांच्या शेतातील पोल धोकादायकरीत्या झुकले आहेत. तसेच मजित कडुभाई पठाण (गट नं. ५५/१) व नांन्हुसिंग सकरू जाधव (गट नं. ५५/२) यांच्या शेतातील थ्री-फेज लाईनचे पोलही झुकलेल्या अवस्थेत आहेत.
पावसाळ्यात पुन्हा जोरदार वारे व पाऊस झाल्यास हे पोल कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रतिक्रिया :
“वादळी वाऱ्यामुळे झुकलेले वीज पोल महावितरणने तात्काळ दुरुस्त करावेत. भविष्यात जोरदार पाऊस व वादळात हे पोल कोसळल्यास शेतकरी व नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.”
— कैलास जाधव




















