कोपरगाव, दि.२० : दिलीप गायकवाड
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. नोंदणीकृत पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही प्रचाराला वेग घेतला असून घरदारांपर्यंत पोहोचण्याची चुरस वाढली आहे. यंदाची निवडणूक विशेष ठरणार असून नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांची एकत्रित निवडणूक होत असल्याने मतदारांना दोन मतांचा हक्क मिळणार आहे.
नगरपरिषदेची रचना १५ प्रभाग आणि एक नगराध्यक्ष अशी असून नगराध्यक्षपदासाठी संपूर्ण शहरभर फिरून प्रचार करावा लागत आहे. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, यावेळी मतदार पक्ष चिन्हांपेक्षा उमेदवारांच्या ‘चरित्रावर’ जास्त भर देताना दिसत आहेत. उमेदवाराचा पूर्वीचा कारभार, स्वभाव, भ्रष्टाचाराचे आरोप, मालमत्ता तपशील यांसारख्या मुद्द्यांवर मतदार खुलेपणाने चर्चा करत आहेत.
भाजपाकडून पराग संधान हे मागील पराभव विसरून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून काका कोयटे यांनी भाजपाची साथ सोडून आमदार अशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार सुरू केला आहे. कोयटे यांच्या बाबतीत निवरा वसाहतीतील काही मुद्द्यांवर चर्चा रंगत असल्याचे दिसते.
दोन्ही शिवसेना गटांनीही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिले आहेत. शिवसेना (ए. शिंदे) गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे मैदानात आहेत, तर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाकडून सपना मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
याशिवाय, माजी नगराध्यक्ष विजय वाधाणे हे अपक्ष म्हणून लढत असून, माजी नगराध्यक्ष बबन वाजे यांचे चिरंजीव दीपक वाजे हेही अपक्ष उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.
शहरातील चर्चेनुसार, पक्षीय उमेदवारांइतकीच चर्चा अपक्ष उमेदवारांभोवतीही रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे, दीपक वाजे (अपक्ष) आणि सपना मोरे (शिवसेना – उद्धव ठाकरे) या दोघांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे कोपरगावचे राजकारण अधिकाधिक रंगू लागले असून, अंतिम निकालापर्यंत अनेक नवे समीकरणे निर्माण होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.




















