मुंबई, दि. १८ : नितीन एडके
जालना व छत्रपती संभाजीनगरमधील वाढते वायू व जल प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरोधात उच्चस्तरीय बैठक घेऊन त्वरित कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जालना औद्योगिक वसाहत तसेच छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज, शेंद्रा आणि ऑरिक सिटी औद्योगिक वसाहतींतील वायू व जल प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री मुंडे यांनी आढावा बैठक घेतली. बैठकीस विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंग, सहसंचालक (हवा प्रदूषण) सतीश पडवळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांचे प्रादेशिक अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ व जिल्हा प्रशासनातील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
जालना औद्योगिक वसाहतीतील स्टील उद्योगांमुळे हवेत धुलीकणांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांनी प्राथमिक हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणांमध्ये तातडीने सुधारणा कराव्यात. जे उद्योग आवश्यक यंत्रणा उभारणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज औद्योगिक वसाहतीत सांडपाणी प्रक्रिया युनिट कार्यरत असून सांडपाण्याच्या १०० टक्के पुनर्वापरास परवानगी देण्यात आली आहे. प्रक्रिया केलेले पाणी खाम नदीत न सोडता त्याचा पूर्ण पुनर्वापर होईल, याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही मंत्री मुंडे यांनी दिले.




















