एसआरपीएफ ग्रुप ८, मुंबई येथे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण
पैठण , दि. ८ : अजय मगरे
नांदर गावचा सुपुत्र विश्वंभर शिवाजी मगरे यांनी राज्य राखीव पोलिस बल क्रमांक ८, मुंबई ( एसआरपीएफ ग्रुप ११ ) येथे आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशानंतर ते गावात परतल्यावर ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

गावच्या मध्यवर्ती चौकात झालेल्या स्वागत सोहळ्यात ग्रामस्थांनी “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. नवयुवकांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत, फुलांची उधळण करत त्यांचा सत्कार केला.
यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळींनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातून आलेल्या एका तरुणाने कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर राज्य राखीव पोलिस दलात स्थान मिळवणे ही नक्कीच अभिमानास्पद बाब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या यशामुळे गावात उत्साहाचे वातावरण पसरले असून, आजच्या तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.
या प्रसंगी गावातील मान्यवर, युवा मित्रमंडळी, नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गावाचा मान उंचावणाऱ्या विश्वंभर मगरे यांचा पुढील सेवेमध्ये यशाचा मार्ग उज्ज्वल होवो,” अशा शुभेच्छांचा वर्षाव ग्रामस्थांनी केला.




















