एकाच कुटुंबातील चार जण भाजले – नवरात्र उत्सवातील घटाजवळ घडली दुर्दैवी घटना
पैठण, दि.६ : अभिजीत सोनवणे
पैठण तालुक्यातील खंडाळा येथे नवरात्र उत्सवात देवीच्या घटाजवळ ठेवलेल्या पेट्रोलच्या बाटलीचा अचानक भडका उडाल्याने एकाच कुटुंबातील चार जण गंभीर भाजले होते. या अपघातातील दोन बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना बुधवार २४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील प्रकाश मोहन दळवी यांनी आपल्या मुलाच्या मोटारसायकलसाठी पेट्रोल बाटलीत काढून ठेवले होते. याच ठिकाणी नवरात्र उत्सवातील देवीचा घट ठेवण्यात आला होता आणि दिवा पेटलेला होता. दरम्यान, पेट्रोल ठेवलेल्या बाटलीचा अचानक भडका उडाला. यात प्रकाश दळवी, अविनाश दळवी, सुरेखा दळवी आणि आकाश दळवी हे चौघे गंभीर भाजले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र भाजण्याचे प्रमाण गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचार सुरू असताना आकाश प्रकाश दळवी (वय १५) याचा रविवारी, दि. ५ ऑक्टोबर रोजी तर अविनाश प्रकाश दळवी (वय १४) याचा शनिवारी, दि. ४ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
घटनास्थळी सपोनि सचिन पंडीत, विहामांडवा चौकीचे पो.उ.नि. श्रीहरी विजय बोबडे व बीट जमादार किशोर शिंदे यांनी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेने खंडाळा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.




















