खेळाडूंची ‘भारत स्पोर्ट्स पोर्टल’वर नोंदणी अनिवार्य….
महा-देवा प्रोजेक्टसाठी संघटन बळकट करा – डॉ. प्रशांत नारनवरे
मुंबई, दि. १५ : अजय मगरे
राज्यातील सर्व विद्यापीठांअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयाने स्वतंत्र फुटबॉल संघ तयार करावा तसेच प्रत्येक खेळाडूची ‘भारत स्पोर्ट्स पोर्टल’वर नोंदणी करावी, असे स्पष्ट निर्देश राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. महाराष्ट्र शासनाच्या ‘महा-देवा प्रोजेक्ट’अंतर्गत फुटबॉलसह विविध खेळांना चालना देण्यावर त्यांनी भर दिला.
लोकभवन’ येथे महा-देवा प्रोजेक्ट तसेच राज्यातील क्रीडा विकासाबाबत डॉ. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. या बैठकीला राज्यपालांचे उपसचिव राममूर्ती, लोकभवनमधील सह संचालक (वै. वि. मं.) विकास कुलकर्णी यांच्यासह राज्यातील सर्व विद्यापीठांचे क्रीडा संचालक उपस्थित होते.
डॉ. नारनवरे म्हणाले, राज्यपाल महोदयांच्या सूचनांनुसार प्रत्येक महाविद्यालयातील खेळाडूंची सुसूत्र नोंद आवश्यक आहे. भारत स्पोर्ट्स पोर्टलवर कोणता खेळ, किती खेळाडू, त्यांची पातळी याची माहिती नोंदविण्यासाठी महाविद्यालयांनी विशेष मोहीम राबवावी. याबाबत विद्यापीठांनी आपल्या क्रीडा संचालकांना आवश्यक सूचना द्याव्यात. खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी क्रीडा विभागाने अधिक प्रभावीपणे काम करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी क्रीडा प्रतिष्ठानने या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावून ॲथलेटिक्स, कबड्डी तसेच विविध खेळांतील खेळाडूंची नोंद सुनिश्चित करावी, जेणेकरून एकत्रित व विश्वासार्ह माहिती उपलब्ध होईल, असे डॉ. नारनवरे यांनी सांगितले. दर आठवड्याला कामाचा आढावा घेतला जाईल. शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन क्रीडा अधिकाऱ्यांनी जनजागृती करावी, असेही निर्देश देण्यात आले.
एकदा सर्व खेळाडूंची नोंद पूर्ण झाल्यानंतर स्थानिक ते विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांचे नियोजन सुलभ होईल. त्यातून तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. नुकतेच जागतिक फुटबॉलपटू लिओनल मेस्सी मुंबईत आले होते, याचा उल्लेख करत ‘महा-देवा प्रोजेक्ट’अंतर्गत फुटबॉलसाठी विशेष मार्गदर्शन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक महाविद्यालयाने फुटबॉल संघ स्थापन करून सक्रिय सहभाग घेतल्यास महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रात नक्कीच भरीव कामगिरी करेल, असा विश्वासही डॉ. नारनवरे यांनी व्यक्त केला.




















