शालेय समिती अध्यक्षांच्या हट्टामुळे शेतकऱ्याचे रोजचे नुकसान; नागरिकांमध्ये संताप**
पैठण, दि.११.( अजय मगरे)
न्यू हायस्कूल, दावरवाडी येथे पिकांचे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या नुकसानीबाबत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने त्वरीत सकारात्मक निर्णय घेत कंपाऊंडसाठी निधी मंजूर केला असतानाही, हे काम जाणीवपूर्वक थांबवण्यात येत असल्याचा सनसनाटी आरोप समोर आला आहे.
शाळेसाठी जमीन दान देणाऱ्या तांगडे कुटुंबाच्या शेतातील उगवणाऱ्या पिकांची दररोज नासधूस होत असतानाही, शालेय समिती अध्यक्ष श्री. श्यामदादा तांगडे यांच्या हट्टामुळे मंजूर काम सुरू होऊ नये म्हणून धनादेशावर स्वाक्षरीच केलेली नाही, असा गंभीर आरोप शालेय समिती सदस्य अशोक तांगडे यांनी केला आहे.

दान दिलेल्या जमिनीवरच नुकसान — आणि शाळा शांत!
कै. रंगनाथ तांगडे यांनी समाजभावनेतून शाळेसाठी जमीन दिली.आज त्याच जमिनीच्या शेजारील शेतीचे नुकसान शाळेकडूनच होत आहे—
ही स्थिती अत्यंत विडंबनात्मक आणि संतापजनक असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
मंडळाची कारवाई जलद – समिती अध्यक्षांचा अडथळा अधिक जलद!
अनेक तक्रारींची दखल घेऊन मंडळाने:
तार–कंपाऊंड मंजूर केले
निधी तत्काळ उपलब्ध केला
परंतु यानंतरही काम सुरू होऊ नये म्हणून शालेय समिती अध्यक्षांकडून हेतुपुरस्सर अडथळा निर्माण होत असल्याचे तांगडे यांनी सांगितले.
अशोक तांगडे म्हणाले,
“प्रशासकीय अधिकारी आणि मंडळ यांची मंजुरी असताना एका व्यक्तीने फक्त राजकीय हट्टासाठी काम रोखणे म्हणजे अधिकारांचा उघड गैरवापर आहे. रोजच्या रोज माझ्या शेतावर आर्थिक वार होत आहे.”
शेतकऱ्याच्या नुकसानीपेक्षा ‘राजकारण’ महत्त्वाचे?
गावकऱ्यांच्या मते, शाळेच्या सुरक्षाभिंतीसाठी निधी मंजूर झाल्यानंतरही काम रोखले जाणे हे सरळसरळ राजकीय दबावाचे लक्षण असून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा वैयक्तिक मतभेदांना महत्त्व दिले जात आहे.
आंदोलनाची जोरदार चेतावणी
“आता पुरे झाले.
मंजूर काम त्वरित सुरू केले नाही तर लोकशाही मार्गाने जोरदार आंदोलन उभारले जाईल,”
असा इशारा तांगडे यांनी दिला आहे.
न्यू हायस्कूल दावरवाडी परिसरात या प्रकरणामुळे तीव्र नाराजी पसरली असून,
मंडळ सकारात्मक – शालेय समिती अध्यक्ष नकारात्मक
अशी स्पष्ट प्रतिमा नागरिकांमध्ये तयार झाली आहे.




















