मुंबई, दि. ६ : अजय मगरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी अभिवादनासाठी येतात. या अनुयायांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि सर्व सुविधा उत्तम दर्जाच्या पुरवाव्यात, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
डॉ. आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस महानिरीक्षक मनोज शर्मा, महापालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री आठवले म्हणाले की, “चैत्यभूमीवर अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, पिण्याचे पाणी, शौचालये, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था आणि परिसर स्वच्छता या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहावे.”
या बैठकीत चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरातील रस्ते दुरुस्ती, सीसीटीव्ही व्यवस्था, भोजन व आरोग्य सुविधा, तसेच शासकीय प्रसिद्धी यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामकाज आणि चैत्यभूमीपासून इंदू मिलपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचाही आढावा घेण्यात आला.




















