मुंबई, दि. ११ ( अजय मगरे )
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आणि जीएसटी प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आंतरराज्य वाहतूक सुरळीत होणार असून वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
१९६६ पासून कार्यरत असलेल्या या चौक्यांची आवश्यकता आता डिजिटल प्रणाली व जीएसटी मुळे उरलेली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी निर्देश दिले होते. राज्य ट्रान्सपोर्ट युनियननेही यासाठी सातत्याने मागणी केली होती.
पूर्वी “इंटिग्रेटेड चेक पोस्ट” प्रकल्पांतर्गत अदानी प्रा.लि. या संस्थेला चौक्यांचे व्यवस्थापन देण्यात आले होते. आता हे चेक पोस्ट बंद केल्यामुळे ५०४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे आवश्यक आहे.तसा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे संबंधित मालमत्ता व यंत्रणा परिवहन विभागाच्या मालकीची होणार आहे.
या निर्णयामुळे महाराष्ट्र आधुनिक, कागदविरहित व तंत्रज्ञानाधारित परिवहन व्यवस्था स्वीकारणाऱ्या राज्यांमध्ये सामील होईल. यामुळे वाहतूक सुलभ होईल, कार्यक्षमता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.




















