मुंबई, दि.३०.(प्रतिनिधी)
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चु कडु यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा करत “रस्त्यावरचा आवाज थेट निर्णय प्रक्रियेत” आणण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी दोन नावे जाहीर केली असून बच्चू कडू यांच्यासह माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या अंतिम क्षणी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईत झालेल्या कार्यक्रमात बच्चू कडूंनी स्पष्ट केले की, प्रहार संघटना सामाजिक पातळीवर स्वतंत्र राहील; मात्र राजकीय लढा शिवसेनेच्या माध्यमातूनच उभारला जाईल. शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
बच्चू कडू यांची ओळख ही आंदोलनातून घडलेली आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लढा दिला असून त्यांच्या आंदोलनांमुळे सरकारला महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले, असे शिंदेंनी नमूद केले.
“कार्यकर्त्यांना थेट निर्णय प्रक्रियेत स्थान देणे गरजेचे आहे,” असे सांगत शिंदेंनी आपल्या भूमिकेवर ठामपणे शिक्कामोर्तब केले.
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांच्या अनुभवालाही महत्त्व देत शिवसेनेने संतुलित नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आंदोलनातून आलेले नेतृत्व आणि अनुभवी नेतृत्व यांचा संगम साधण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसत आहे.




















