ठाणे, दि.३०.( अजय मगरे )
२०१४ साली अपहरण झालेल्या करण अरविंद बागुल (वय २३, रा. दावडी गाव) यांच्या प्रकरणाचा तब्बल बारा वर्षांनंतर धक्कादायक उलगडा झाला आहे. गुन्हे शाखा, घटक-०३, कल्याण यांच्या पथकाने या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केली आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये अपहरणाचा गुन्हा (क्र. ६४०/२०१४, भा.द.वि. कलम ३६५) दाखल होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी चंद्रकांत बाळाराम गायकर (वय ३९, रा. डोंबिवली पूर्व) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून केलेल्या चौकशीत संपूर्ण कट उघडकीस आला.
तपासात समोर आले की, सुरेंद्र पांडुरंग पाटील (वय ५५, व्यवसाय – कन्स्ट्रक्शन) याचा करण बागुल याच्यासोबत जमीन व्यवहारावरून वाद झाला होता. या वादातून ४ ऑक्टोबर २०१४ रोजी पाटील याने बागुल याचे अपहरण करून त्याला दावडी येथील आपल्या ऑफिसमध्ये नेले. तेथे लोखंडी रॉडने डोक्यावर व तोंडावर वार करून त्याचा खून करण्यात आला.
यानंतर आरोपी सुरेंद्र पाटील, चंद्रकांत गायकर आणि सुरेश गोपाल देगावत उर्फ छोटू (वय ३२) यांनी मिळून मृतदेह स्विफ्ट कारमधून मुरबाड तालुक्यातील बारवी डॅम परिसरातील घनदाट जंगलात नेऊन अज्ञातस्थळी विल्हेवाट लावली.
दरम्यान, ७ ऑक्टोबर २०१४ रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता (अकस्मात मृत्यू नोंद क्र. ४७/२०१४). तपासाअंती हा मृतदेह करण बागुल याचाच असल्याचे आता निश्चित झाले आहे.
या प्रकरणात आता भा.द.वि. कलम ३०२ (खून), २०१ (पुरावे नष्ट करणे) आणि ३४ (सामूहिक हेतू) यांची भर घालण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.




















