आमदार वरुण सरदेसाईंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मुंबई, दि.१८ : मंगेश म्हात्रे
वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील शासकीय वसाहतीत राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मालकी हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचा विषय पुन्हा एकदा गतीमान झाला आहे. या मतदारसंघाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सर्वे क्र. ३२९, न.भु.क्र. ६२९/१२३४/अ/१ या महत्त्वाच्या शासकीय भूखंडाचे आरक्षण करण्याची ठोस मागणी केली आहे.
सरदेसाई यांनी यापूर्वीही या प्रश्नावर अनेक वेळा निवेदनाद्वारे आणि अधिवेशनात आवाज उठवून अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या घरांच्या मागणीला योग्य तो न्याय मिळावा, यासाठी पाठपुरावा केला आहे. सार्वजनिक बांधकाम
विभागाने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, वांद्रे शासकीय वसाहतीतील दीर्घकाळ राहणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला भूखंड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री कार्यालयात तातडीने बैठक आयोजित करून संबंधित शासकीय भूखंड अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मालकी हक्क गृहनिर्माण प्रकल्पासाठी आरक्षित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.
या पत्रामुळे वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून निर्णयाची उत्सुकता वाढली आहे.




















