राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे अधिकाऱ्यांना आदेश
मुंबई : अजय मगरे
राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसाठा वाढविणे, सिंचन क्षमता विस्तार करणे आणि पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे आवश्यक असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
निर्मल भवन येथील एमएसआरडीसी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संजय चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी व्यापक उपाययोजनांची गरज असल्याचे सांगत अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना पाटाचे पाणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तलाव, तळी, धरणे आणि कालव्यांच्या दुरुस्ती व सक्षमीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
पुराचे पाणी साठविण्यावर भर
दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पावसाचे आणि पुराचे पाणी वाहून जात असल्याने नद्या व तलावांचे खोलीकरण, नवीन चेकडॅम आणि बंधारे उभारणे, नाल्यांच्या बांधकामात सुधारणा करणे तसेच पुराचे पाणी प्रभावीपणे साठविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
पूरामुळे अनेक गावांना धोका निर्माण होत असल्याने अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, असे सांगत पूरनियंत्रणाची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर साकोरे-बोर्डीकर यांनी भर दिला.
‘जलयुक्त शिवार’ प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्व कामांचे नियमित ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले. ‘जलयुक्त शिवार’ अभियान प्रभावीपणे राबविण्याबरोबरच ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना अधिक परिणामकारकरित्या अंमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. धरणांतील गाळ काढून तो शेतीसाठी वापरण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीत अनेक गावे सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर अवलंबून असल्याची माहिती देण्यात आली. काही गावांमध्ये दोन ते तीन टँकर नियमित सुरू असून भविष्यात पाणी साठवण व्यवस्थेत सुधारणा झाली नाही तर आणखी गावांना टँकरची आवश्यकता भासू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.
पाइपलाइनद्वारे पाणी वितरणावर भर
सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी पाइपलाइनद्वारे पाणी वितरण, प्रेशर इरिगेशन प्रणाली, ठिबक सिंचन आणि कार्यक्षम पाणी वापर तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला. बंद पाइपलाइन प्रणालीमुळे पाण्याची गळती कमी होऊन अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणणे शक्य होईल, असेही साकोरे-बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.
पाण्याची बचत, जलसाठा वाढ आणि शाश्वत सिंचन व्यवस्थेमुळे शेती उत्पादनवाढीस मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.














