मुंबई, दि.२३ : अजय मगरे
परिवहन विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना मोटार वाहन निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीसोबत अधिकारांबरोबरच जबाबदारीत वाढ झाल्याचे सांगत, राज्यातील रस्ता सुरक्षा वाढवून अपघाती मृत्यू रोखण्यावर भर द्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या पद अलंकरण सोहळ्यात पदोन्नत अधिकाऱ्यांच्या गणवेशावर नव्या पदाचे चिन्ह लावून पदभार स्वीकारण्याचा समारंभ पार पडला. या वेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर, सह आयुक्त संजय मेहेंत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, विनोद सागवे आदी मान्यवर उपस्थित होते.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, एस.टी. महामंडळाद्वारे तळागाळातील नागरिकांची सेवा केली जाते. राज्याच्या महसूलात पाचव्या क्रमांकावर असलेल्या परिवहन विभागात आमूलाग्र सुधारणा सुरू आहेत. पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या जागांवर नवीन उच्चशिक्षित उमेदवारांना संधी मिळणार असून विभागात तंत्रज्ञानस्नेही व कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध होईल.
राज्यातील रस्ते अपघात टाळण्यासाठी गतिरोधक-मुक्त यंत्रणा, एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अपघात प्रतिबंधात्मक उपाययोजना, तसेच दिशादर्शक फलकांची संख्या वाढविणे यांसारखे उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “अपघात होऊच नयेत अशी व्यवस्था निर्माण करणे हाच खरा उद्देश आहे,” असे त्यांनी पदोन्नत अधिकाऱ्यांना सांगितले.
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनीही पदोन्नत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “वाहनांची संख्या आणि तंत्रज्ञान वेगाने वाढत असताना नागरिकांच्या अपेक्षाही जागतिक दर्जाच्या झाल्या आहेत. अपघात रोखणे ही विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. भारतातील सर्वात मोठी आयटीएमएस प्रणाली उभारून रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यात येत आहे.”
या कार्यक्रमात प्रास्ताविक अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांनी केले. प्रातिनिधिक स्वरूपात ८ अधिकाऱ्यांना पद अलंकरण करण्यात आले. या वेळी पदोन्नत अधिकाऱ्यांना कर्तृत्वाची शपथ देण्यात आली. अधिकाऱ्यांच्यावतीने मोटार वाहन निरीक्षक प्रवीण हरदे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन विजय इंगोले यांनी केले.




















