मुंबई, दि. १ : अजय मगरे
राज्यातील शासकीय सेवेत दीर्घकाळ रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कुटुंबांना दिलासा दिला आहे. येत्या 4 ऑक्टोबर रोजी ५१८७ अनुकंपा उमेदवार आणि ५१२२ एमपीएससी उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे एकाच दिवशी प्रदान केली जाणार आहेत. तब्बल १०,३०९ नियुक्त्यांचा हा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.
शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना नोकरीची संधी दिली जाते. मात्र तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे हजारो प्रकरणे रखडली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संवेदनशील प्रश्नात लक्ष घालून सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले. सततच्या आढाव्यांनंतर नवीन अनुकंपा धोरण राबवण्यात आले आणि यामुळे प्रलंबित अनुशेष संपुष्टात आला.
मुख्य कार्यक्रम ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत पार पडणार असून, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित राहणार आहेत. तर राज्यातील पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यांत नियुक्तीपत्रांचे वितरण करतील.
सर्वाधिक नियुक्त्या कोकण विभागात
या कार्यक्रमात सर्वाधिक ३०७८ उमेदवार कोकण विभागातील, तर २५९७ विदर्भातील आहेत. पुणे विभागात १६७४, नाशिक विभागात १२५०, तर मराठवाड्यातील १७१० उमेदवारांना शासकीय सेवेत रुजू होण्याची संधी मिळणार आहे.




















