ठाणे दि.९.अजय मगरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या १३५ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी अभिवादनासाठी येत असतात. या पार्श्वभूमीवर जयंती उत्सव सुरळीत व सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे तसेच करण्यात आलेल्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वतयारीसंदर्भात कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडली. या बैठकीस अपर आयुक्त फरोग मुकादम, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, भन्ते डॉ. राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाले.
आयुक्त अग्रवाल म्हणाल्या की, जयंती उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने विशेष दक्षता घ्यावी. महानगरपालिकेने स्वच्छता, पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये, आरोग्य सेवा तसेच चैत्यभूमी परिसरातील साफसफाई याबाबत योग्य नियोजन करून जबाबदारी पार पाडावी.
तसेच कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची रोषणाई, संविधानाच्या प्रतींचे वाटप, जनजागृतीपर कार्यक्रम, व्याख्याने आणि सामाजिक समतेचा संदेश देणारे विविध उपक्रम आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, नियंत्रण कक्षाची स्थापना, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका व्यवस्था, रेल्वे व बेस्ट सेवा, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख, पोलीस बंदोबस्त तसेच वाहतूक नियोजन यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला. कोकण विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सामाजिक समता सप्ताह आणि जयंतीनिमित्त उपक्रमांची माहिती दिली.




















