सुदैवाने जीवितहानी टळली
कोपरगांव, दि.२७ (दिलीप गायकवाड )
नगर-मनमाड महामार्गावरील कोपरगांवजवळ आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन फोर व्हीलर गाड्यांमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. हा अपघात कोपरगांव येथील बेट, कोठारी फर्निचर शोरूम व कातकडे क्रिकेट स्टेडियमजवळ घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या वळणावर लिंबाच्या झाडामुळे दृश्यमानता कमी झाली आणि त्यामुळे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. संबंधित ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडले असून, केवळ चार दिवसांपूर्वीच एक ट्रक रस्ता सोडून बाजूला गेल्याची घटना घडली होती.
या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून मागील आठवड्यात पुणतांबा फाटा येथे एका महिलेला कॅन्टरने चिरडले होते. त्या अपघातात महिलेला जागीच मृत्यू आला होता. या अपघातांमागे महामार्गावरील अपूर्ण कामे, रस्त्यावरील खड्डे, आणि पावसामुळे निर्माण होणारी चिखलमय अवस्था ही प्रमुख कारणे असून, या मार्गावर सतत खडी, माती आणि खोदकाम सुरू असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी यासाठी आमदार व प्रशासन यांना जबाबदार धरले असून, अपघात टाळण्यासाठी कोणतेही ठोस उपाय केले जात नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदारांचे ठेकेदारांवर नियंत्रण नसल्यामुळे विकासकामे अर्धवट असून नागरिक याचा त्रास भोगत आहेत.अपघातग्रस्त रस्त्यावर तातडीने उपाययोजना करून वाहतुकीस सुरक्षित बनवावे, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे.





















