ठाणे, दि. १२ (अजय मगरे)
बौद्ध धर्मीयांच्या पवित्र महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी ठाणे शहरात भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. बौद्धगया महाविहार कायदा १९४९ रद्द करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाकडे सोपवावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभा ठाणे अध्यक्ष सुनिल निकम, वंचित बहुजन आघाडी महासचिव मोहन नाईक, सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा अध्यक्ष अनिकेत मोरे यांनी केले. शेकडो बौद्ध अनुयायी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सरकारला या ऐतिहासिक अन्यायाविरोधात त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली.

जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात ठाणे जिल्ह्यातील विविध बौद्ध संघटनांचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, केंद्रीय शिक्षिका, बौद्धाचार्य, समता सैनिक दलाचे अधिकारी व सैनिक, तसेच तालुक्याचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

महाबोधी महाविहार मुक्तीसाठीचा संघर्ष नव्याने पेटला असून, सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.




















