ठाणे : अजय मगरे
ठाणे जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण विद्यार्थ्यांना थेट अवकाश संशोधनाचा अनुभव देणाऱ्या ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी हिरवा झेंडा दाखवला. ‘ग्रामीण ते अवकाश’ हे व्हिजन प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या उपक्रमांतर्गत ९५०० विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या ५९ विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे भेट देण्याची संधी मिळणार आहे.
जिल्हा नियोजन भवनातून सकाळी १०.३० वाजता या शैक्षणिक सहलीला प्रारंभ झाला. २६ जानेवारी २०२६ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात ९३१६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यातून २००७ विद्यार्थ्यांची तालुकास्तरावर निवड झाली. अंतिम टप्प्यातील जिल्हास्तरीय परीक्षेनंतर प्रत्येक तालुक्यातील सरासरी १० विद्यार्थ्यांची निवड करून एकूण ५९ विद्यार्थ्यांना सहलीसाठी पात्र ठरवण्यात आले. यामध्ये ५४ मराठी व ५ उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ही सहल केवळ पर्यटन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेला उपक्रम आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनाविषयी कुतूहल निर्माण करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
इस्रोसह महत्त्वाच्या स्थळांना भेट
या सहलीत विद्यार्थ्यांना २८ एप्रिल रोजी विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि सनसेट पॉईंटला भेट दिली जाणार आहे. २९ एप्रिल रोजी विक्रम साराभाई स्पेस सेंटर, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशन आणि प्रियदर्शिनी तारांगण येथे भेट दिली जाईल. त्यानंतर नैसर्गिक इतिहास संग्रहालये आणि नेपियर संग्रहालय येथेही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.विद्यार्थ्यांसाठी विशेष सोयी
विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली असून, वातानुकूलित बसेसची सुविधा देण्यात आली आहे. सहलीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. विद्यार्थ्यांना ब्लेझर, टी-शर्ट, ट्रॅक पॅन्ट, कॅप, स्पोर्ट्स शूज, सॉक्स, ओळखपत्र आणि ट्रॉली बॅग देण्यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, कोणतीही सुविधा कमी पडू नये, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवी दिशा
“९५०० विद्यार्थ्यांमधून ५९ विद्यार्थ्यांची निवड ही अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ग्रामीण मुलांना इस्रोसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेत जाण्याची संधी मिळणे ही मोठी गोष्ट आहे,” असे शिंदे म्हणाले.
एपीजे अब्दुल कलाम, महात्मा गांधी आणि संत गाडगेबाबा यांच्या विचारांनुसार हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.सहलीवरून परतल्यानंतर हे विद्यार्थी आपल्या अनुभवांचे इतर विद्यार्थ्यांशी वाटप करणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी प्रेरणा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















