भंते विमांसा यांचे धरणे आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच
मुंबई, दि.२५ : अजय मगरे
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरूंनी २०२३ मध्ये पाली विभागास जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. हा शब्द फिरवून कुलगुरूंनी इराणी भाषांच्या विभागात जागा देण्याचे जाहीर केले आहे. हा बौद्ध समाजाशी विश्वासघात असून कुलगुरूंचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप भंते विमांसा यांनी केला आहे.
पाली विभागास अनुदान जाहीर करावे आणि भंतेंचा छळ थांबवावा, या मागणीसाठी भंते विमांसा यांचे विद्यापीठाच्या कलिना संकुलाच्या प्रवेशद्वारासमोर गेले पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.
मुंबई विद्यापीठाकडून पाली विभागावर होत असलेल्या अन्यायाविरोधात व विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून भंते विमांसा यांचे धरणे आंदोलन सुरू आहे.
भंते विमांसा म्हणाले की, “१९१२ मध्ये धर्मानंद कोसंबी यांनी स्थापन केलेला पाली विभाग हा आमच्या बौद्ध अस्मितेचा वारसा आहे. पण विद्यापीठ प्रशासन हा विभाग संपवण्याचा प्रयत्न करत आहे.
पाली विभागास अद्याप ॲडेड दर्जा मिळालेला नाही, उलट अवेस्ता पहेलवीसारख्या नव्याने उभ्या केलेल्या विभागांना प्राधान्य दिले जात आहे. हे आमच्या संस्कृतीशी व समाजाशी विश्वासघात करणारे पाऊल आहे.”त्यांनी आणखी सांगितले की, “विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात केवळ ८० जागा आहेत. उर्वरित ३०० विद्यार्थ्यांना जागा नाकारली जाते. अशा परिस्थितीत गरीब व ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांचे शिक्षण थांबते. हा सरळ अन्याय असून, आम्ही तो सहन करणार नाही.”
भंते विमांसा यांचे हे धरणे आंदोलन पूर्णतः शांततेत, मौन व ध्यानधारणेच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र पाच दिवस उलटूनही विद्यापीठ प्रशासन मौन बाळगत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये व समाजात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, विविध भिक्षू, भिक्षुणी, विद्यार्थी व समाजबांधव मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी भेट देत आहेत. भंते विमांसा यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जोपर्यंत पाली विभागाला स्वतंत्र जमीन, ॲडेड दर्जा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबवले जाणार नाही.”




















