ठाणे, दि.१८ : अजय मगरे
ठाणे शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, खाजगी अनुदानित तसेच विना अनुदानित शाळांना दि. १८ ऑगस्ट व १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हवामान खात्याचा रेड अलर्ट व महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आज दुपारच्या सत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याची जबाबदारी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी सुरक्षितपणे घरी पोहोचेपर्यंत शाळा मुख्यालय सोडू नये, असे आदेश शिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे यांनी दिले आहेत.
सुट्टीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा, प्रशिक्षण व इतर उपक्रम शाळांनी नजीकच्या काळात आपल्या पातळीवर पूर्ण करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. पालक व विद्यार्थ्यांना याबाबत शाळांनी तातडीने कळविण्याचे आदेश आहेत.




















