मुंबई, दि.८ : महादू पवार
“आंबेडकरी चळवळ अपात्र ठरण्याऐवजी पात्र ठरवली, तरच पुढच्या पिढीसमोर दलित पँथरचा तेजस्वी इतिहास अधिक उजागर होईल ” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी केले.
चेंबूर येथील सर्वोदय बुद्ध विहारामध्ये पँथर नेते अरविंद निकाळजे यांच्या अमृत महोत्सवी सन्मान सोहळ्यात बोलताना डांगळे म्हणाले की, सध्याच्या बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत आंबेडकरी चळवळीने अधिक ताकदवान होणे आवश्यक आहे. यावेळी साहित्यिक प्रमोद आगलावे यांनी आवाहन केले की,

“रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीने सर्व मतभेद बाजूला ठेवून निळ्या ध्वजाखाली एकत्र यावे.” पँथर नेते सुरेश केदारे यांनी चळवळीची नवी संकल्पना उभी करण्याची गरज व्यक्त केली, तर रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस गौतम सोनावणे यांनी नव्या पिढीच्या निष्क्रियतेबद्दल चिंता व्यक्त करत जुन्या पिढीच्या कार्यकर्त्यांचे आदर्श पुढे करण्याचे आवाहन केले.
निकाळजे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. त्यांच्या समाजकारणातील योगदानाचा गौरव मान्यवरांनी केला. यावेळी श्रीकांत तळवटकर, अँड .धम्मकिरण चेन्ने, दिलीप कटारे, गौतम सांगळे, पत्रकार मधु कांबळे, नितीन मोरे आदी क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.
समाजाच्या हक्कांसाठी अखेरपर्यंत लढा देणारे निकाळजे हे पँथर चळवळीचे खरे आधारस्तंभ असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भदंत राहुल बोधी यांनी “बुद्ध धम्म जगभर पसरत आहे, त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे भविष्य उज्ज्वल आहे,” असे सांगत आशावाद व्यक्त केला. त्रिसरण घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. अखेरीस अरविंद निकाळजे यांचा सत्कार करण्यात येऊन उपस्थितांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.




















