मुंबई : अजय मगरे
विविध असंघटित क्षेत्रांतील कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सिटूच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर सुरू असलेल्या आक्रोश ठिय्या आंदोलनाला मंगळवारी मोठा प्रतिसाद मिळाला. बांधकाम, घरेलू, बिडी, ऊसतोड, यंत्रमाग आदी क्षेत्रांतील हजारो कामगार आंदोलनात सहभागी झाले होते.
आंदोलनाचे नेतृत्व सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सरचिटणीस एम. एच. शेख, के. आर. रघु, डॉ. विवेक मॉन्टेरो, शुभा शमीम, भूषण पाटील, उज्वला पडलवार, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, नसीमा शेख, आरमायटी इराणी, किरण मोघे, आबासाहेब चौगुले आणि युसुफ मेजर यांनी केले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांवर त्यांनी जोरदार टीका केली.
प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ व अर्जुन सेनगुप्ता समितीच्या सदस्या डॉ. सुमंगला दामोदरन यांनी आंदोलनाला मार्गदर्शन करताना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने विशेष आर्थिक तरतूद करणे आवश्यक असल्याचे सांगितले. देशातील सुमारे ९० टक्के कामगार असंघटित क्षेत्रात कार्यरत असून आर्थिक विकासात त्यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. डीवायएफआयचे राज्याध्यक्ष मोहन जाधव, कॉ. शैलेंद्र कांबळे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवित बेरोजगारी वाढविणाऱ्या धोरणांवर टीका केली.
क्रांतिकारी शाहीर संभाजी भगत यांनी आपल्या झंझावाती गीतांद्वारे कामगारांना संबोधित केले. समाजात जात-धर्माच्या नावावर फूट पाडून सत्तेचे राजकारण करणाऱ्यांवर त्यांनी गीतांमधून प्रहार केला.
दरम्यान, कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी सिटूच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले. डॉ. डी. एल. कराड, एम. एच. शेख, आमदार विनोद निकोले, डॉ. विवेक मॉन्टेरो, आरमायटी इराणी, किरण मोघे, भरमा कांबळे आणि आबासाहेब चौगुले यांचा शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर करण्यात आले.
कामगारांना कायम नोकरी, किमान ३० हजार रुपये वेतन, भविष्य निर्वाह निधी, ईएसआय, पेन्शन, क्षेत्रनिहाय कल्याणकारी मंडळांची स्थापना, चार श्रमसंहितांची अंमलबजावणी रद्द करणे, महागाई नियंत्रणात आणणे तसेच योजना कर्मचाऱ्यांना कायम करून त्यांना सामाजिक सुरक्षा लाभ देणे या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत.




















