मुंबई, दि. ६ : मंगेश म्हात्रे
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून राबविण्यात येणारे सर्व प्रकल्प वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण व्हावेत, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक बांधकाम (राजमार्ग) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.
निर्मल भवन, नरिमन पॉईंट येथील ‘एमएसआरडीसी’ कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सहसंचालक मनूज जिंदल, भू-सर्वेक्षण विभागाचे महाव्यवस्थापक रामदास खेडेकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, “नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीच्या सुलभतेसाठी काटेकोर नियोजन करून कामे करावीत. प्रकल्पाच्या गतीमध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “रस्ते प्रकल्पांमुळे प्रवासाचे अंतर कमी होणार असून, वेळ आणि इंधनाची बचत होईल. नागरिकांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.”
या बैठकीत रेवस–रेड्डी राष्ट्रीय महामार्गातील गुहागर तालुक्यातील १३ ते १५ कि.मी. रस्त्याचे पुनःसर्वेक्षण व फेररचना, विरार–अलिबाग महामार्ग, नाशिक रिंग रोड (वर्तुळाकार रस्ता) तसेच भंडारा–गडचिरोली द्रुतगती महामार्ग या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या प्रगती अहवालांचे सादरीकरण करण्यात आले.
या वेळी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना प्रकल्पांची अंमलबजावणी जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.




















