मुंबई : अजय मगरे
कल्याण येथील चिकणघर परिसरातील बुद्धभूमीच्या सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असून, येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहुउद्देशीय प्रकल्प उभारला जाणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली.
त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आनंदराज आंबेडकर, बुद्धभूमी फाउंडेशनचे पदाधिकारी, भन्ते तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यातील सुमारे १३.९६ हेक्टर क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केले जाणार आहे. या प्राधिकरणात सामाजिक न्याय विभागासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि बुद्धभूमी फाउंडेशनचे प्रतिनिधी सहभागी असतील.
फाउंडेशनने सादर केलेल्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या ‘जागतिक बुद्धभूमी धम्मकेंद्र’ आराखड्यात ६० मीटर उंचीची बुद्धमूर्ती, ३२ मजली भगवान गौतम बुद्ध बहुउद्देशीय थीम भवन, महाबोधी महाविहाराची प्रतिकृती, विपश्यना केंद्र, भिक्खू-भिक्खुणी प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, चिल्ड्रेन होम, पशु-पक्षी चिकित्सालय, कायदेविषयक सल्ला केंद्र आणि राष्ट्रीय महापुरुषांची स्मारके उभारण्याचा प्रस्ताव आहे.
याशिवाय अत्याधुनिक मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण संकुल, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, महिलांसाठी स्वावलंबन प्रशिक्षण केंद्र, वृद्धाश्रम, ग्रंथालय, संगणकयुक्त अभ्यासिका तसेच ध्यान व आध्यात्मिक केंद्र विकसित करण्याचाही आराखडा बैठकीत मांडण्यात आला.
सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि बौद्ध पर्यटनाचा संगम घडवणारा हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी नवा विकासाचा मानबिंदू ठरेल, असा विश्वास व्यक्त करत मंत्री शिरसाट यांनी संबंधित यंत्रणांना विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.




















